ठेकेदार भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विचारवंत नाहीत, की रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थकही नाहीत. आपला धंदा सुरक्षित राहावा, सरकारी निधी मोकळा व्हावा, एवढाच एकमेव अजेंडा घेऊन हे लोक भाजपमध्ये दाखल झाल्याची चर्चा फलटण शहरापासून तालुक्यातील गावोगाव रंगली आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये सर्वात मोठा अन्याय होत आहे तो खऱ्या, प्रामाणिक भाजप कार्यकर्त्यांचा. निवडणुकीच्या रणधुमाळीत घरदार सोडून, स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून पक्षासाठी झटलेले कार्यकर्ते बाजूला पडत असून, सत्ता दिसताच जवळ येणाऱ्या ठेकेदारांना पुढच्या रांगेत स्थान दिले जात असल्याची भावना तीव्र होत आहे
फलटण | प्रतिनिधी
फलटण शहर व तालुक्यात भारतीय जनता पक्ष व महायुतीने मोठी राजकीय आघाडी घेतल्यानंतर अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशाच पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना सोडून गेलेले काही ठेकेदार पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
हा प्रवेश राजकीय निष्ठेपोटी नसून, पूर्णतः स्वार्थी हेतूने झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. संबंधित ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची अडकलेली बिले शासनाकडून मंजूर व्हावीत, यासाठीच त्यांनी सत्ताधारी पक्षाचा मार्ग धरल्याची उघड चर्चा फलटण शहरासह ग्रामीण भागात सुरू आहे.
विशेष म्हणजे हे ठेकेदार ना भाजपचे खरे विचारवंत, ना राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक, ना खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे प्रेमी असल्याचे बोलले जात आहे. “जिथे सत्ता तिथे वळण” हीच भूमिका घेऊन आपल्या व्यवसायाची सोय साधण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे.
या साऱ्या घडामोडींमुळे भाजपसाठी अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. निवडणुकीच्या काळात रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते बाजूला पडत असताना, केवळ आर्थिक हितसंबंधासाठी आलेल्यांना महत्त्व दिले जात असल्याची भावना बळावत आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयानंतर तालुक्यात स्वागत समारंभांचा धडाका सुरू असताना, या समारंभांमध्येही असेच स्वार्थी घटक पुढे येताना दिसत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यामुळेच आता तालुक्यात एकच सवाल ऐकू येत आहे—
“खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि भाजप नेतृत्व अशा स्वार्थी ठेकेदारांना दूर ठेवणार का? की खऱ्या, निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देत त्यांना जवळ करणार?”
या प्रश्नाचे उत्तर आगामी काळातील भाजपच्या भूमिकेतून स्पष्ट होणार असून, फलटण तालुक्यातील राजकारणाची दिशा यावरच ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.



















