फलटण, दि. १० जून : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचा ६७ वा वर्धापन दिन बुधवारी (दि. १० जून) श्रीराम संकुलात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे ढोल-ताशांच्या गजरात व पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), प्रशालेचे माजी विद्यार्थी अच्युतराव खलाटे (दादा) आणि घाडगे आप्पासाहेब ज्ञानोबा यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. कु. सस्ते आर. एस. यांनी संस्थेच्या वर्धापनदिनाचे महत्त्व अधोरेखित करत विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच NMMS व इलेमेंटरी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे अच्युतराव खलाटे (दादा) यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाला उजाळा दिला. सन १९५९ मध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतल्याच्या आठवणी सांगताना त्यांनी संस्थापक स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था उभारल्याचे सांगितले. आज छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे समाधान व्यक्त करत त्यांनी संस्थेच्या प्रगतीचे श्रेय स्वर्गीय सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) तसेच डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) आणि महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांना दिले.
संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देत संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला.
वर्धापनदिनानिमित्त मान्यवर, सेवानिवृत्त सेवक, गुणवंत विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि बीजारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये जांभूळ, आंबा, चिंच, करंज व सुबाभूळ या वृक्षांच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले, तसेच शालेय परिसरात विविध सुशोभित वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या सौ. गायकवाड एन. एम., उपप्राचार्य श्री. घनवट पी. डी., सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास माध्यमिक व ज्युनिअर विभागातील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच सेवानिवृत्त सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. अरगडे एस. टी. यांनी केले. गुणवंत विद्यार्थी सत्काराचे वाचन श्री. यादव एस. डी. यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. सस्ते सी. एस. यांनी केले.











