आमचे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर आम्ही कायमच राहणार असून कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष सोडणार नाही - प्रसाद पवार - पाटील
फलटण प्रतिनिधी :
सोमवार पेठेतील नगरपालिका निवडणुकीत आमच्याच काही गद्दारांनी कुठनीतीचा अवलंब केल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला, असा आरोप प्रसाद पवार -पाटील यांनी केला आहे. माझी आई श्रीमती नर्मदा किसनराव पवार - पाटील तसेच बंधू देवीदास (देवा अण्णा) पवार - पाटील यांनी प्रभाग क्रमांक १ मधून निवडणूक लढवली होती. मात्र अंतर्गत गद्दारीमुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमचा पराभव झाला असला तरी निवडून आलेल्या दोन्ही नगरसेवकांनी विजयाचा उन्माद न करता मिळालेल्या संधीचे सोने करावे व सोमवार पेठेतील विकासकामांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा प्रसाद पवार -पाटील यांनी व्यक्त केली. मतदारांनी दिलेल्या कौलाचा आदर राखून कोणालाही अडकवण्याच्या भानगडीत न पडता विकासात्मक राजकारण करावे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना यावेळी प्रसाद पवार - पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे आमच्या पाठीशी कायम असून आमचे कोणतेही काम ते तत्परतेने करतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्ष सोडणार नसल्याची ग्वाही प्रसाद पवार - पाटील यांनी दिली.
निवडणुकीत पराभव झाला असला तरी सोमवार पेठेतील विकासासाठी मी व माझे बंधू देवा अण्णा हे सातत्याने समाजासोबत राहणार आहोत. मतदानाच्या वेळी दिलेला शब्द आम्ही नक्की पाळू, असे आश्वासन देत शेवटी प्रसाद पवार - पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.



















