धोम - बलकवडी प्रकल्पग्रस्थांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी धोम - बलकवडी धरणग्रस्त संघटनेच्या वतीने गुरुवार, दिनांक 16 पासून फलटण तालुक्यातील पुनर्वसित गोळेवाडी,(ठाकुरकी ) येथे आमरण उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या लेखी आश्वासानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संपत कळंबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यावेळी फलटण येथील जेष्ठ पत्रकार व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी आंदोलनास पाठिंबा देत आंदोलकांच्या मागण्या मान्य होण्यासंदर्भात विशेष प्रयत्न केलेचे सांगण्यात आले.
पुनर्वसित गावांना महसुली दर्जा देणे, पुनर्वसित गावठाणातील सातबारा वरील मूळ स्थानिकांचे नाव कमी करून संबंधित पुनर्वसीत गावाचे नाव दाखल करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना वाटप झालेल्या जमिनीचे नकाशे फेर करून मिळावे, व त्यांच्या प्रति कबजेपट्टी सह मिळाव्यात, सातबारा खाते निहाय विभक्त करून मिळावे, दळणवळण व जाण्या येण्यासाठीचे रस्ते करण्यात यावेत, वहिवाटीचे अडथळे दूर व्हावेत, वाटप जमीन प्रकरणात मूळ मालक यांचे कडून शासनाकडे दाखल प्रकरणासाठी प्रकल्पग्रस्त खातेदारांना प्रतिवादी न करता शासन यंत्रणेला करावे, या आणि अशा 19 मागण्या संदर्भात आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले होते.
वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी फोन वरून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संपर्क साधत दिनांक 29 मार्च रोजी मागण्या संदर्भात विशेष सभेचे आयोजन केले असल्याचे पत्र दिले. यावेळी वाईचे तहसिलदार वैभव पवार हे उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता धोम बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांनी धरणग्रस्त संघटनेची मिटींग दिनांक 29 रोजी घेण्यात येईल असे लेखी पत्र दिले आहे. तर फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव तसेच खंडाळा तहसीलदार यांच्या वतीने दिनांक 23 मार्च रोजी मागण्यासंदर्भात मिटिंग घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
धोम - बलकवडी धरणग्रस्त पुनर्वसित संघटना यांच्या आंदोलनास फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन कांबळे - पाटील, वाखरीचे सरपंच तुकाराम शिंदे, काळे, नायब तहसीलदार फलटण, संजय खांडेकर,उपअभियंता धोम बलकवडी प्रकल्प विभाग वाई, ताकवले, उपअभियंता धोम बलकवडी प्रकल्प विभाग वाई, यांनी उपोषण स्थळी भेट दिली.
फलटण शहर पोलिस प्रशासन यांच्या वतीने उपोषण स्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. उळूब (फरांदवाडी ), गोळेवाडी (वाठार -निंबाळकर ) गोळेगाव (ठाकुरकी ) जोरगाव (कुरवली खुर्द ) जोर (वाखरी ) ता. फलटण, गोळेगाव (लोणंद, ता. खंडाळा ), आदी पुनर्वसित गावातील नागरिक उपोषणात सहभागी झाले होते.



















