फलटण प्रतिनिधी - विडणी गावातील ज्येष्ठ नेत्यांनी शिक्षण संस्था व इतर माध्यमातून गावाला योग्य विचार दिला. त्यांनी गावाचा जो पाया रचला त्या पायावरच चांगली इमारत उभी राहत आहे. त्या विचारावरच आपण व आपले सहकारी कार्यरत असून गावामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या दोन स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संधीचे सोने करावे, असे आवाहन उपमुख्य उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अव्वर सचिव धीरज अभंग यांनी केले.
विडणी गावचे ग्रामदैवत कालभैरवनाथ यात्रेचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी नूतनीकृत केलेल्या अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा व मोफत आरोग्य शिबिराप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जे. टी. पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमिता गावडे, अंकुश नाळे, प्रा. के. ननावरे, प्रा. डी. एन. शिंदे, सरपंच सागर अभंग, अमोल अभंग, अनिल शेंडे, डॉ. प्रवीण अभंग, कुंदन शेंडे, योगेश इंगळे, प्रदीप शिंदे यांचे प्रमुख उपस्थिती होती.
धीरज अभंग म्हणाले, मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला. सर्वांनाच अभ्यासासाठी मोठ्या शहरात जाता येत नाही. तो संघर्ष पुढील विद्यार्थ्यांना करावा लागू नये म्हणूनच विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये अभ्यास करताना आजपर्यंत एकूण २३ विद्यार्थी विविध स्पर्धातून विविध क्षेत्रात नियुक्त झाले आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक तज्ञांकडून मार्गदर्शन तसेच गावातील माझे सहकारी अधिकारी यांच्यावतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी या हेतूने 'उमेद' चॅरिटेबल ट्रस्टची संकल्पना आहे भविष्यात लवकरच ती कार्यान्वित होईल.
डॉ. पोळ म्हणाले, विडणी गावातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यासिका उपलब्ध करून देत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. अधिकाऱ्यांचा गाव म्हणून या गावाची ओळख निर्माण झाली असून धीरज अभंग व त्यांचे सर्व सहकारी विविध उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत हे निश्चितच
कौतुकास्पद आहे. विद्याथ्यर्थ्यांनी शरीर स्वस्थ ठेवायचे असेल तर सर्वच व्यसनापासून दूर राहावे. धावत्या जीवनशैलीमध्ये ताण-तणावापासून दूर राहायचे असेल तर संतुलित आहार, व्यायाम व योगासने यावर लक्ष द्यायला हवे.
यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने विविध भाग शाळांना वॉटर कुलर प्युरिफायरचे वाटप, विविध पदांवर नियुक्त झालेले मयूर नाळे, विदुला देशपांडे, डॉ. हिमांशू बोडरे या अधिकाऱ्यांच्या व सरपंच सागर अभंग यांची राष्ट्रीय प्रधान मुखिया संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाविकांना मोफत लस्सीचे वाटप करण्यात आले. प्रा. सचिन अभंग यांनी प्रास्ताविक केले. सचिन अभंग यांनी स्वागत केले. रवींद्र परमाळे यांनी सूत्रसंचालन केले.
लवकरच डॉल्बी बंदीचा निर्णय
सरपंच सागर अभंग म्हणाले, गावामध्ये सर्वांच्या सहकार्याने मुलींसाठी नव्याने सुरू केलेली सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आनंद वाटत आहे. दुर्दैवाने यावेळी यात्रेनिमित्त डॉल्बीचा दणदणाट खूपच होता. दरवर्षी लाखो रुपयांचे उधळण या डॉल्बीवर होत आहे. गावातील अनेक विचारवंत व ग्रामस्थांच्यावतीने याविषयी वारंवार नाराजी व्यक्त होत असून यात्रा कमिटी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरच डॉल्बी बंदी, व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेण्यात येईल असे सांगितले.