फलटण प्रतिनिधी
फलटण शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील नागेश्वरनगर चौधरवाडी येथील येथील गळफास घेऊन आत्महत्या करणारी तरुणी ऋतुजा सुशांत रासकर (वय २२) ही पोलिस नसल्याचे पोलिस तपासात समोर आले असून पोलिस वर्दीवर अनेक फोटो व व्हिडिओ काढून सोशल मीडियाचा टाकत होती तसेच ती नातेवाइकांना मुंबई पोलिस असल्याचे सांगत होती. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋतुजा रासकर हिने शनिवारी दिनांक 24 रोजी नागेश्वरनगरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ती मुंबई पोलिस दलात कार्यरत असल्याचे समोर आल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. त्यावेळी प्रथमदर्शनी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली की ऋतुजा रासकर ही नातेवाइकांना आणि गावातील लोकांना मुंबई पोलिस दलात नोकरी करतेय, असे सांगत होती. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर खाकी वर्दीवरचे फोटो अपलोड करून ती नेहमी प्रकाश झोतात असायची. तिचे सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ बघणारे लाखोंच्या घरात आहेत तर फॉलोअर्सची संख्या ५० हजारांच्या आसपास आहेत.

ऋतुजा मुंबई पोलिसांच्या पीसीआर दुचाकीवर बसून तिने फोटो व्हायरल केले होते तर काही फोटो कोरोना काळात एका महिलेला मदत करतानाचे दिसून येत आहेत. तसेच परवा झालेल्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना मदत करतानाचा व्हिडिओ ही प्रचंड वायरल झाला होता. साऱ्या फोटोवरून व व्हिडिओ वरुण ती मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे, असेच सगळ्यांना वाटत होते; परंतु फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी ऋतुजा ही पोलिस नसल्याचे सांगितले असून ऋतुजाने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे तिच्या घरातले लोक नाराज झाले होते. या लोकांची नाराजी दूर करण्यासाठी व सहानुभूती मिळविण्यासाठी तिने पोलिस असल्याचे म्हणे खोटे सांगितले होते की काय याचा शोध पोलिस घेत आहेत. घरातील व्यक्तींना ही ऋतुजा पोलिस खात्यात नोकरीला होती की नव्हती याबाबत काहीच पुराव्यानिशी अद्याप सांगता आले नाही. ऋतुजा रासकर हिने कोणत्या कारणांतून आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही अधिक तपास पोलिस करीत असुन पुढिल तपासातच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


















