आमचं काळीज, भावी नगरसेवक, युवकांचे आशास्थान,युवा नेते, भैया, दादा, असे म्हणणारे व म्हणून घेणाऱ्या युवकांनो सावधान. आपण एखाद्या स्वार्थी राजकीय नेत्याच्या चक्रव्हूवात अडकत तर नाही ना हे जाणून घ्या. यासाठीच हा लेख प्रपंच..
राजकारण करायचे असल्यास युवा नेते बनण्यापूर्वी निदान स्वतःच्या दोन वेळच्या भाकरीची तजवीज करून ठेवा मगच सक्रिय राजकारण आपला वेळ द्या.
व्याजाने पैसे आणून कितीही मोठ मोठाले होर्डिंग्ज लावले तरी घरी कुणीही धान्य आणून देत नाही आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यालाच पार पाडावी लागणार आहे हे लक्षात ठेवा. तुमची उपयुक्तता संपली की तुम्हाला तुमचे आदर्श नेते खरूज लागलेल्या कुत्र्याप्रमाणे फाटकाबाहेर उभे करतील असे अनुभव अनेकांनी घेतले आहेत याची माहिती घ्या.
तुम्ही हातात मोठ्या अभिमानाने मिरविलेले पिवळे, भगवे, निळे, लाल, आणि हिरवे झेंडे तुमच्या अवस्थेवर खो खो हसतील आणि आयुष्यातील तरुणपणाची वेळ निघून गेल्यावर निराशाजनक आयुष्याशिवाय हाती काहीच लागणार नाही. नोकरी किंवा व्यवसाय नसलेल्या तरुणांचा भविष्यकाळ अत्यंत बिकट असणार आहे.
कुणी आपला स्वाभिमान विकलेला आहे, कुणी कळलाव्या नारदाची भूमिका बजावत आहे हे ध्यानात घ्या. आपण ज्या नेत्यांना आदर्श मानतो त्यांची संपत्ती किती आहे, त्याने हे धन कुठे कष्ट करून कमवले आहे याचा अभ्यास करा. अनेक वाममार्गानेच तुमचे आवडते नेते पैशांनी गब्बर झालेले आहेत व येथून पुढे राजकारण हे त्यांच्याच अवती भवतीच फिरत राहील याची ते सोयीस्करपणे मांडणी करतात यावर विचार करा.
पक्ष, पक्ष- संस्कार, पक्षाची विचारधारा या निव्वळ पोकळ गप्पा असून या भाकडकथा तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना फुकटात राबवून घेण्यासाठीच रचलेल्या असतात. जेवढा वेळ आपण नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवितो, तेवढ्या वेळात एखादे छोटे मोठे काम वा व्यवसाय करून आपण कुटुंबासाठी कमवून आपण आपल्या आई वडिलांचे स्वप्नं पूर्ण करू शकतो. या जगात आपल्या स्वतः पेक्षा मोठा विकासपुरुष अन्य कुणीही असू शकत नाही हे ध्यानात घ्या.
आपल्या एकामुळे जगाचे काहीही बरे-वाईट होत नाही. आपण स्वतःचा विकास केल्यास राष्ट्राचा विकास आपोआप होतो. लाखांच्या गाडीत हिंडणाऱ्या व्यक्तीस गरीबाशी, बेरोजगाराशी काहीही देण घेण नसतं, तो फक्त आपला स्वार्थ जपत असतो. त्यामुळे आपली घरची परिस्थिती बेताची असल्यास नेत्यांच्या अजिबात मागे लागू नका.
आपल्याला पुढे आर्थिक चणचण, शुगर, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, राजकारणाच्या नादी लागून फुकटचे विकत घेतलेले शत्रुत्व व बेरोजगारी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले तर जेव्हा तुमचे आवडते नेते तुम्हाला कसलीही आर्थिक मदत करणार नाहीत हे लक्षात घ्या किंवा आपल्या नेत्याला याविषयी अजमावून घ्या म्हणजे आपले डोळे उघडतील.
तुमचं तारुण्य निघून गेल्यावर कुणीही तुम्हाला दारू पाजणार नाही किंवा मटन खाऊ घालणार नाही, कारण तुमचा उपयोग संपल्यावर अन्य कुणी तरी दुसरा मूर्ख तरुण रिक्रुटमेंटसाठी कायम नेत्यांपुढे तयार असेल त्यावेळी आपले आयुष्य वाया गेले ही एकमेव भावना मनात आल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे स्वतःला सावरून आयुष्य संपन्न बनविण्याचे हेच वय असते हे ध्यानात घ्या व नेत्यांच्या मागे धावण्यात आयुष्य वाया घालवू नका.
सचिन मोरे, संपादक - धैर्य टाईम्स, फलटण



















