सचिन मोरे - फलटण
ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी चळवळीतील प्रख्यात नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे रविवारी दुपारी १२:३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.अन्सारी हे जुना जालना येथील रेल्वे गेटजवळील नूतन वसाहत येथे वास्तव्यास होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सहा मुली आणि मोठा परिवार आहे. त्यांच्या राहत्या घरातून आज रात्री ईशा नमाजानंतर रात्री ९ वाजता अंत्ययात्रा निघणार असून, सय्यद अहमद शेर सवार दर्गा येथे नमाज-ए-जनाजा अदा करण्यात येईल. त्यानंतर जवळील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार आहे
ओबीसी चळवळीतील एक भक्कम व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन्सारी यांनी चार दशकांहून अधिक काळ आपले जीवन इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) हक्क आणि कल्याणासाठी समर्पित केले. त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून काम करत महाराष्ट्रासह देशभरात सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी तळागाळातील जनतेचे संघटन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षण, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व यांसारख्या विविध क्षेत्रांतील ओबीसी समस्यांवर ५० हून अधिक शासकीय निर्णय (जीआर) जारी करण्यात आले. तळागाळातील लोकांशी थेट संवाद साधण्याची आणि गुंतागुंतीचे प्रश्न सोप्या भाषेत मांडण्याची त्यांची शैली यामुळे त्यांना सर्वत्र मान-सन्मान मिळाला.
अन्सारी यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत देशपातळीवर ओबीसी हक्कांबाबत अनेक बैठका घेतल्या होत्या. मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तसेच मुस्लिम समाजातील मागासवर्गीयांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठीही ते प्रयत्नशील होते. देशभरातील ओबीसी नेत्यांसोबत त्यांनी चळवळ अधिक बळकट करण्यासाठी कार्य केले.
प्रशासकीय अडचणी, राजकीय विरोध आणि सामाजिक आव्हाने यांचा सामना करूनही अन्सारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. छत्रपती संभाजीनगर येथे मंडल दिनानिमित्त झालेल्या ओबीसी मेळाव्यातील त्यांचे अलीकडील भाषण त्यांच्या तळमळीचे प्रतीक ठरले, ज्यामध्ये त्यांनी तरुण पिढीला समता आणि न्यायासाठीचा लढा पुढे नेण्याचे आवाहन केले. राज्यातील विविध नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, सामाजिक न्यायाच्या चळवळीत ही मोठी पोकळी असल्याचे म्हटले आहे. त्यांचे आयुष्यभराचे समर्पण आणि त्याग भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.










