फलटण (दि.७) : फलटण तालुक्यातील धुळदेव यात्रेत यंदा एक ऐतिहासिक आणि उल्लेखनीय बदल पाहायला मिळाला. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेत दरवर्षी लाखो भाविकांची उपस्थिती असते, मात्र मूलभूत सुविधांचा अभाव कायम जाणवत होता. यंदा विडणी गणाचे नूतन पंचायत समिती सदस्य तथा अध्यक्ष सचिनराव अभंग यांनी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या नेतृत्वाखाली यात्रेत मोठा बदल घडवून आणला.
वर्षानुवर्षे भाविकांना अंधारात यात्रा पार पाडावी लागत होती. विशेषतः रात्रीच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता, तसेच महिला भाविकांसाठी स्नानाची कोणतीही ठोस व्यवस्था नव्हती. या सर्व समस्यांची दखल घेत अध्यक्ष सचिनराव अभंग यांनी स्वतः पुढाकार घेत काम हाती घेतले.
यात्रा परिसरात हॅलोजन लाईट्स बसवून संपूर्ण परिसर उजळून टाकण्यात आला. त्यामुळे रात्रीची यात्रा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर झाली आहे. याशिवाय महिला व इतर भाविकांसाठी शॉवरसह तात्पुरती स्नान व्यवस्था उभारण्यात आली. विशेष म्हणजे ही संपूर्ण व्यवस्था अध्यक्ष अभंग यांनी स्वतःच्या खर्चातून केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या अचानक झालेल्या सकारात्मक बदलामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र अध्यक्ष सचिनराव अभंग यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. “अध्यक्ष म्हणजे काम आणि काम म्हणजे अध्यक्ष” अशा शब्दांत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या उपक्रमामुळे विडणी गणातील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, आगामी काळातही अशाच प्रभावी आणि लोकहिताच्या कामांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











