राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू केली आहे. याबरोबरच आता जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करणे शक्य होणार आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय येाजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, 1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 + 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2022-23 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक/ शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ
https.//ah.mahabms.com
अँड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव
AH.MAHABMS
(Google play स्टोअरवरील मोबाईल ॲपवर उपलब्ध )
अर्ज करण्याचा कालावधी
13/12/2022 ते 11/1/2023
टोल फ्री क्रमांक
1962 किंवा 1800-233-0418
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आली आहे. पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वत: मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरतानाच्या अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. मागिल वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्त्यात दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. अंकुश परिहार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सातारा यांनी केले आहे.
















