फलटण प्रतिनिधी :

फलटण नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड सध्या मिस्टर इंडिया या हिंदी चित्रपटातील अनिल कपूर यांच्या सारखे असूनही दिसेनासे झाल्याने फलटण नगर पालिकेचा कारभार ढेपाळला आहे. मुख्याधिकारी घरी बसून काही ‘महत्त्वाची’ कामे करीत असल्याची चर्चा फलटण शहरात असल्याने फलटणकर मुख्याधिकाऱ्यांना मिस्टर इंडिया या हिंदी चित्रपटातील अनिल कपूरच्या भूमिकेत पाहू लागले आहेत. फलटणकरांना कामासाठी नगर पालिकेत हेलपाटे मारावे लागत असल्याने तोंड दाबून बुक्यांचा मार खावा लागत असल्याची चर्चा फलटण मध्ये सुरु आहे.
मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांची बदली फलटण नगर परिषद मुख्याधिकारी पदी झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी सुरुवातीला चांगले काम केल्यानंतर नगर पालिकेचा निवडणूक कालावधी संपून प्रशासक म्हणून नेमणूक होताच संपूर्ण कामकाज ठप्प झाले असून फलटणकर मात्र या मुळे पुरते बेजार झाले आहेत.गेल्या अनेक महिन्यात मुख्याधिकारी गायकवाड यांनी फलटण नगर पालिकेत येवून कामकाज करणे बंद केले आहे. परिणामी, नगर पालिकेचा कारभार ठप्प झाला आहे. नागरिकांना नवीन बांधकाम परवानगी, नामांतर व अन्य कामांसाठी नगर पालिकेत चकरा माराव्या लागत आहेत. शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे तर स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे नागरिकांना मोठया समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
फलटण नगर पालिकेत मुख्याधिकारीच गैरहजर असल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी, नगर पालिका कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांविना ओस पडली आहे. अनेक बेकायदेशररित्या कामाचा सुळसुळाट वाढला आहे. अनेक नागरिकांचे अर्ज कारवाई विना पडून असून नागरिक हेलपाटे मारून हैराण होत आहेत. नगर परिषदेच्या संपुर्ण कामकाज संथ गतीने सुरू असून शहरातील विविध समस्येत वाढ आहे.
मुख्याधिकारी संजय गायकवाड दैंनदिन कामकाजात लक्ष घालत नसल्याने अधिकारी व कर्मचारी बिनधास्त राहत आहेत. शहरातील अनेक विकास कामे ठप्प झाली असून नागरीकांना निवडणुक कार्यक्रम जाहीर होऊन नगरसेवक नगर परिषदेत येतील व कामे करतील अशी आशा लागली आहे. एकूणच नगर परिषदेचा कारभार सुधारण्याची गरज असून याप्रकरणी स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

















