सातारा दि. 17 : अभियंता दिनी जलशक्ती अभियान-कॅच द रेन व जलसाक्षरता अभियानांतर्गत मेजर अतुल गर्जे सभागृह, सैनिक स्कूल सातारा येथे पाण्याचे जतन करणे नदी नाले, धरणामधील पाण्याचे प्रदुषण रोखणे, पाणी वापर संस्थेचे सक्षमीकरण करणे व जलसंधारण या विषयासंदर्भातील जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जलसंपदा विभागाच्या सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार, धोम कालवे विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता विकास पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरूणकुमार दिलपाक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन जलसाक्षरता - जलप्रदूषण या विषयी जाणीव जागृतीचे महत्व विषद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांनी जलसाक्षरता, जलप्रदूषण या विषयी तसेच पाणी वापर संस्थांचे महत्व या विषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
वाल्मी औरंगाबादचे सेवा निवृत्त व्याख्याते बी.एम.शेटे यांनी पाणी वापर संस्थेची ओळख, स्ंस्थेची स्थापना व दैनंदिन कामकाज यावरील व्याख्यान दिले.पाणी वापर संस्थांची आवश्यकता, फायदे, संस्था स्थापन करणेचे कायदेशीर बंधन व कामकाज इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सहकार कायदा 1960 मधून महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन 2005 कायदयानुसार पाणी वापर संस्थेचे रूपांतरण, रुपांतरणाची गरज, फायदे व कार्यपद्धती, सन 2005 चा महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा येणेपूर्वी स्थापन झालेल्या पाणी वापर संस्था सहकार कायदा सन 1960 नुसार स्थापन झालेल्या आहेत परंतू आता त्या पाणी वापर संस्था म.सिं.प.शे.व्य.सन 2005 या कायद्यामधील तरतूदीनुसार रुपांतरीत करण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने त्याबाबतची कार्यपध्दती व अशा रुपांतरणाची गरज, फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
जलयोध्दा कोल्हापूर उदय गायकवाड यांनी जलप्रदूषण कसे व कोणकोणत्या मार्गानी होते व त्यास आळा घालण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे कसे आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा नदीचे जलप्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या पध्दतीने टप्या-टप्याने काय उपाययोजना राबवल्या त्या बाबतचा आराखडा व केलेल्या उपाययोजनांचे संक्षिप्त सादरीकरण केले. यावर्षीच्या अनंत चर्तुदशी दिवशी नदी-नाले / तलाव जलाशयामध्ये होणारे निर्माल्य व गणेश विसर्जन पूर्णपणे रोखण्यासाठी जिल्हाभर गट निर्माण करुन सुमारे 3.25 लाख मुर्त्यांची व निर्माल्याची पर्यावरण पूरक दृष्टीने विल्हेवाट लावली असेही सांगितले.
जलयोध्दा नाशिक अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले कालवा पाणी वापर संस्था ओझरत् ( मिग ) गोवर्धन कुलकर्णी यांनी पाणी वापर संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे फायदे व त्यांनी त्यांचेकडील पाणीवापर संस्थेने अवलंबलेले कांही मार्ग याबाबत मार्गदर्शन केले. पाणी वापर संस्था क्रियाशील राहणे हे संस्थेस निर्धारित केलेला पाणी कोटा अबाधीत राखणेसाठी कसे गरजेचे आहे. तसेच पाण्याचे काटकसरीने व पूर्ण कार्यक्षमतेने वापर होण्याच्या दृष्टीने कसे गरजेचे आहे ही बाब अधोरेखित केली. पाणी वापर संस्था शेतीपुरक व्यवसायांचा अवलंब करून पाणी वापर संस्थेची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल बाजारभावाच्या अवस्थेतही कशी उंचाऊ शकते याबाबतही त्यांनी उदाहरणासह विशद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता अशोक पवार यांनी केले तर जलयोध्दा जलसाक्षरता समिती, सातारा प्रदीप पाटणकर यांनी आभार प्रदर्शन केले.
















