सातारा, दि. 28 – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात बांबू लागवड अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये 10 गुंठ्यांपासून 1 हेक्टरपर्यंत बांबू लागवड करता येते.
सलग बांबू लागवडीसाठी 3 मीटर बाय 3 मीटर अंतरावरील (110) रोपे लागवडीसाठी तीन वर्षांचे मिळून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 6 लाख 90 हजार रुपये मिळतात. तर बांधावर दोन ओळीत बांबू लागवड केल्यास 400 रोपांसाठी हेक्टरी 2 लाख 54 हजार रुपये तीन वर्षांचे मिळून मिळतात.
बांबू लागवडीचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. तिसऱ्या वर्षापासून बांबूचे उत्पादन सुरू होते. जमिनीची धूप व जलसंवर्धन होते. बांबूचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षाचे आहे. पहिली दोन वर्ष त्यामध्ये आंतरपिक घेता येते. क्षारपड व नापिक जमिनीवरही बांबू लागवड करता येते. बांबूच्या लावडीसाठीच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत. टुलडा, न्युटनस, पोलूमोरफा. एका हेक्टरमध्ये सरासरी 5 हजार बांबूचे उत्पादन वर्षाला मिळते.
या योजनेसाठी पात्रता निकष – अल्पभूधारक शेतकरी (5 एकर क्षेत्राच्या आतील), ग्रामपंचायतीमधून नरेगा जॉब कार्डधारक लाभार्थी शेतकरी
बांबूपासून फर्निचर तयार केले जाते. बायोमास म्हणून बांबूचा वापर होतो. औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये दगडी कोळशा ऐवजी बांबूचा इंधन म्हणून वापर होतो. बायो इंधन, बायो इथेनॉल, बायो सी.एन.जी.मध्ये बांबूचा वापर होतो.
या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा. पडीक जमिनीमध्ये व डोंगर उतारावरून सलग बांबू लागवड फायद्याची आहे. तसेच बांधावरील बांबू लागवडीने शेताला कुंपन व जंगली जनावरांपासून शेताचे संरक्षण होऊ शकते. महाबळेश्वर तालुक्यात सध्या 9 हेक्टर बांबू लागवड सुरू असून जुलै महिना बांबू लागवडीसाठी योग्य असल्याचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी सांगितले.
















