जीवनाच्या प्रवासात अनेक नाती जोडली जातात. आई-वडील, भाऊ-बहिण, पत्नी अशी नाती आपल्याला जन्मतः मिळतात; पण मनाच्या जवळ जाणारे एक वेगळे नाते असते ते म्हणजे मैत्री. मनातल्या भावना, आयुष्यातील अडचणी, दुःख-सुख ज्या व्यक्तीसमोर आपण निःसंकोचपणे मांडू शकतो आणि ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतो, असा जिवाभावाचा मित्र आयुष्यात असणे ही मोठी भाग्याची गोष्ट असते. अशाच विश्वासार्ह मैत्रीचे उदाहरण म्हणजे पत्रकार अनिल पिसाळ.
जात-पात, धर्म-पंथ यांच्या पलीकडे जाऊन मनाने मनाशी जुळणारे नाते म्हणजे मैत्री. बालपणीचे सवंगडी, शालेय-महाविद्यालयीन मित्र आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटणारे सहप्रवासी यामध्ये काही जण खास बनतात. अनिल पिसाळ सर हे त्यापैकीच एक जिवलग मित्र.
एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून झालेली ओळख… सुरुवातीला फक्त बातम्या आणि फोटोंची देवाण-घेवाण. पण ही साधी ओळख हळूहळू मैत्रीत रूपांतरित झाली. जणू अनेक वर्षांची ओळख असल्यासारखे रोजचे संवाद, कुटुंबियांची विचारपूस आणि आयुष्य अधिक चांगले कसे घडवता येईल याबाबतचे सकारात्मक विचार हे त्यांच्या मैत्रीचे वैशिष्ट्य.
साखरवाडी सारख्या ग्रामीण भागातून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अनिल पिसाळ हे एक हसतमुख आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी त्यांचा जवळचा संपर्क आहे. त्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रात काम करताना त्यांची वेगळी शैली आणि हातोटी दिसून येते.
शेतकरी कुटुंबात जन्म असूनही आधुनिकतेची कास धरत उज्ज्वल भविष्याच्या दिशेने झेप घेण्याची त्यांची जिद्द उल्लेखनीय आहे. सतत कामात व्यस्त राहणे, वेळेचे महत्त्व ओळखणे आणि प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणे हा त्यांचा स्वभाव. “वेळ वाया घालवू नका, कमी वेळेत मोठी झेप घ्या” हा त्यांचा सल्ला मित्रपरिवाराला नेहमी प्रेरणा देणारा ठरतो.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या कार्याला अधिक यश मिळावे आणि त्यांचे आयुष्य आनंद, समाधान व यशाने भरून जावे, अशी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना.
अनिल पिसाळ यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
– शुभेच्छुक
सचिन संपत मोरे
संपादक – धैर्य टाईम्स
राज्य प्रतिनिधी – प्रिंट व डिजिटल पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य












