सातारा दि. 19 : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तसेच शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते.
या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी त्यांच्या आधार संलंग्न खात्यामध्ये थेट अनुज्ञेय रक्कम जमा करण्यात येते. यामध्ये भोजन भत्ता 25 हजार रुपये, निवासी भत्ता 12 हजार रुपये, निर्वाह भत्ता 6 हजार रुपये असे एकूण 43 हजार रुपये विद्यार्थ्यांच्या आधार संलगन् बँक खात्यामध्ये जमा केले जातात. याव्यतिरिक्त् वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येते.
या योजनेचे निकष पुढीलप्रमाणे - विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थ्याचा (अनु. जाती व नवबौध्द घटकातील) जातीचा दाखला, विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा, विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे, विद्यार्थ्यांना 11 व 12 वी करिता प्रतिवर्षी 50 टक्के गुण (अनु. जाती व नवबौध्द घटकातील दिव्यांगासाठी 40 टक्के) घेवून उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल, तसेच पदवी /पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रतीवर्षी किमान 50 टक्के गुण (अनु. जाती व नवबौध्द घटकातील दिव्यांगासाठी 40 टक्के) घेवून उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल, विद्यार्थ्यांची महाविदयालयातील उपस्थिती किमान 75 टक्के आवश्यक राहिल त्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थेचे प्रत्येक सहामहीस उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल, विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ सर्व पात्र अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी (इ.11 व 12 सहित) जास्तीत जास्त 7 वर्ष अनुज्ञेय असेल, परंतु इंजीनिअरिंग/ वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी (इ.11 व 12 सहित) सदर योजनेचा लाभ हा 8 वर्ष अनुज्ञेय असेल, या योजनेमध्ये दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल) दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के) इतकी राहिल त्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 11 वी, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच दोन वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्गात प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यासाठी या योजनेचे अर्ज वाटप सुरू झाले आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा 415003, दूरध्वनी क्रमांक : 02162-298106 येथे संपर्क साधावा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सातारा नगरपालिका हद्दीपासून 5 किमी अंतराच्या आतील महाविद्यालयामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाच्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे यांनी केले आहे.
















