सातारा दि.9: शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत चला जाणूया नदीला उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात नदीनिहाय संवाद यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. नदी, समाज, आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे या उद्देशाच्या पूर्ततेसाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेने कार्यालयात दर्शनी भागात एक सूचना पेटी ठेवावी. त्यावर ‘चला जाणूया नदीला’ अशा प्रकारचे शीर्षक असावे. ज्या गावातील लोकांना नदी संवाद यात्रेमध्ये दरम्यान प्रत्यक्ष सहभागी होता आले नसेल ज्या गावात नदी संवाद यात्रेचे अयोजन निवडणूकांच्या, गावातील यात्रांच्या पार्श्वभूमीवर करता आले नसेल अशा गावातील नागरीक त्यांच्या सूचना या सूचनापेटीत देऊ शकतील.
ज्या सूचनांवर सदस्यस्तरावरच कार्यवाही करता येईल ती त्या यंत्रणेने करावी तसेच ज्या सूचनावर जिल्हास्तरीय समितीची मान्यता घ्यावी लागेल,असे अर्ज समितीला पाठवावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग तथा चला जाणूया नदीला अभियानाचे नोडल अधिकारी यांनी केले आहे.
















