फलटण प्रतिनिधी :
नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत राजकीय इतिहास घडविला. नगराध्यक्ष पदासह तब्बल १८ नगरसेवक निवडून आणत बहुमत प्राप्त केले असून, सलग ३५ वर्षे फलटणवर सत्ता गाजवणाऱ्या राजे गटाची सत्ता यामुळे संपुष्टात आली आहे. या निवडणूक निकालानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, राजे गटाला धक्क्यावर धक्का बसत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत मिळत असतानाच, कोळकी परिसरावर दीर्घकाळ प्रभुत्व असलेल्या राजे गटाला मोठा हादरा बसला आहे. कोळकी व चौधरवाडी येथील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी राजे गटाशी फारकत घेत थेट भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केल्याने तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
कोळकी येथील प्रभावी कार्यकर्ते अभिजीत शिंदे, बाळासाहेब रिटे व संजय अहिरे यांनी राजे गटाला रामराम ठोकत भाजपची वाट धरली आहे. यासोबतच चौधरवाडीचे विद्यमान सरपंच तुकाराम कोकाटे तसेच प्रल्हाद दंडीले यांनीही राजे गटाशी संबंध तोडून मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे कोळकी व चौधरवाडी परिसरात भाजपचे संघटन अधिक मजबूत झाले असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला याचा मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. राजे गटातील नाराजी, अंतर्गत मतभेद व बदलते राजकीय वारे यामुळे कार्यकर्त्यांनी भाजपकडे मोर्चा वळवल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
भाजप नेतृत्वाने नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत, “सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर विकासाभिमुख राजकारण मजबूत करण्याचा संकल्प” व्यक्त केला आहे. या घडामोडींमुळे फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये रंगत वाढणार हे मात्र निश्चित आहे.











