फलटण (प्रतिनिधी) :
फलटण नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी आता तापू लागली असून, यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या ३२ वर्षांपासून नगरपालिकेवर एकछत्री सत्ता गाजवणाऱ्या रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या गटासमोर माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाने थेट आव्हान उभे केले आहे.
३२ वर्षांची सत्ता — रामराजेंचा अटळ प्रभाव
रामराजे नाईक-निंबाळकर हे फलटणच्या राजकारणातील केंद्रबिंदू राहिले आहेत. विकासकामे, संस्थात्मक नियंत्रण आणि राजकीय संघटनशक्ती या तिन्ही गोष्टींमुळे त्यांनी नगरपालिकेत आपली सत्ता सलग टिकवून ठेवली. त्यांच्या गटातील नगरसेवकांनी गेल्या अनेक कार्यकाळांत फलटण शहरात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व बाजार व्यवस्थापन यामध्ये महत्त्वाचे काम केल्याचा दावा केला आहे.
रणजितसिंहांचा गट — “परिवर्तनाची हाक”
दुसरीकडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी “सत्तेचे केंद्रीकरण थांबवून लोकसत्ताक विकासाला प्राधान्य द्यायचे” असे म्हणत स्वतंत्र गट मैदानात उतरवला आहे. त्यांच्या गटात भाजप व इतर स्थानिक संघटनांतील कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो. रणजितसिंह यांनी शहरात भेटीगाठींना सुरुवात केली असून “फलटणला नव्या नेतृत्वाची गरज आहे” असा संदेश देत जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे.
गटबाजीचा शिखर संघर्ष
दोन्ही गटांमधील हा संघर्ष केवळ सत्तेपुरता मर्यादित नसून ‘फलटणचा वारसा’ कोणाकडे राहणार? हा अभिमानाचा प्रश्न बनला आहे. एकीकडे अनुभवी आणि मजबूत संघटनशक्ती असलेले रामराजे यांचे कार्यकर्ते आहेत, तर दुसरीकडे नव्या पिढीचे नेतृत्व, युवा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि बदलाची लाट रणजितसिंह यांच्या पाठीशी आहे.
प्रमुख चर्चेचे विषय
नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप व विकासातील असंतुलन असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. शहराच्या विस्तारीकरणासाठी नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक समस्या हा शहराला भेडसावणारा प्रश्न मोठा बनला आहे.
केवळ जुन्याच नेतृत्वाला संधी मिळत होती त्यामुळे आता युवांना नेतृत्वात संधी देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.
मतदारांचे गणित
फलटण शहरात प्रभागवार मतदारसंघात दोन्ही गटांचे प्रभावी कार्यकर्ते आहेत. व्यापारी आणि कामगार वर्ग या मतदारवर्गाचे निवड यावेळी निर्णायक ठरू शकतो.
सध्या परिस्थिती अशी की, रामराजेंची सत्ता आणि रणजितसिंहांचे आव्हान यामध्ये थेट राजकीय संग्राम रंगणार आहे. शहरातील राजकीय वातावरण तापले असून, येत्या काही दिवसांत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संघर्षाची तीव्रता अधिक वाढेल हे निश्चित.
फलटणची जनता ३२ वर्षांच्या सत्तेचा अनुभव पुन्हा देणार की नव्या नेतृत्वाला संधी? हा प्रश्नच सध्या फलटणच्या गल्लीबोळात चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे.











