फलटण (प्रतिनिधी)
फलटण नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी, उद्योजक आणि तरुणवर्गामध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी त्यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून, व्यापारी वर्गातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पंचायत समितीचे माजी सभापती चेतन सुभाषराव शिंदे, माजी नगरसेवक अजय माळवे, अमोल भोईटे, मानाजी चव्हाण, संदिप शिंदे, अतुल यादव, बबलू मोमीन, विजय कदम आणि इतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सह फलटण शहरातील व्यापाऱ्यांची भेट घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. यावेळी व्यापाऱ्यांनी समशेरसिंह नाईक निंबाळकर हेच नगराध्यक्ष पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे आवर्जून सांगितले.
समशेरदादांचे राजकारण हे त्यांच्या वडिलांचे, माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या विचारांचा वारसा मानले जाते. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारा हा विचार आज पुन्हा फलटणमध्ये स्वतंत्र विचार घेताना दिसत असल्याने अनेकांनी आपली भावना व्यक्त केली. नगरपालिकेमध्ये समशेरदादांनी विरोधी पक्षनेते म्हणून सक्षमपणे काम केले आहे. नगरपालिकेतील कामाचा त्यांचा अनुभव उल्लेखनीय असाच आहे.
समशेरदादांचे बंधू माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य आणि केंद्र पातळीवर कार्य करताना मोठा अनुभव मिळवला आहे. त्या पार्श्वभूमीवर समशेरदादा हे स्थानिक स्वराज्य संस्थेतील नेतृत्वाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
नागरिकांचे मत असे की, गेल्या 32 वर्षांपासून रामराजेंच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचा विकास ठप्प झाला असून, शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, आणि रस्त्यांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बदलाची हाक नागरिक देत आहेत.
समशेरदादांनी शहरातील विविध भागांतील व्यापारी व नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. “फलटणचा विकास आणि नागरिकांचा सन्मान” या ध्येयाने ते प्रचाराला सुरुवात करत आहेत.
व्यापारी वर्ग, तरुण कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटना यांनी एकमुखाने दादांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याने, फलटणमधील राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होताना दिसत आहे.











