धैर्य टाईम्स -
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलेल्या सुचनेनुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या उज्ज्वल कामगिरीसाठी आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवार दिनांक २० मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता फलटण शहरामध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
मंगळवार दिनांक २० मे रोजी सकाळी ९.०० वा. तहसिल कार्यालय, फलटण येथून तिरंगा रॅलीची सुरवात होणार असून रॅलीचा मार्ग पुढील प्रमाणे असणार आहे.
तहसिल कार्यालय परिसर येथून सुरवात महात्मा फुले चौक - महात्मा गांधी पुतळा (गजानन चौक) - उमाजी नाईक चौक - महावीर स्तंभ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक या पद्धतीने रॅलीचा मार्ग असून सदर तिरंगा रॅलीस फलटण शहरातील व फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.