फलटण प्रतिनिधी :
सागर अजयकुमार दोशी व मित्र परिवार तसेच ओंकार गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला. यावेळी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते विलासराव नलवडे, युवा नेतृत्व रणजित भोसले, माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे, डॉ. सुभाष गुळवे आदि मान्यवर उपस्थित होते.
फलटण शहरातील राजकीय समीकरणांना वेगळी दिशा देणारी ही महत्वाची घटना असून या प्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी भक्कम झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
सागर अजयकुमार दोशी हे राजे गटाचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस फलटण शहरचे माजी प्रवक्ता म्हणून ओळखले जातात. जैन समाजाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांनी अहिंसा युवक कमिटी बहुउद्देशीय संस्था – फलटण या जैन समाजाच्या संस्थेची स्थापना करून संस्थापक अध्यक्ष म्हणून शहरात सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
यावेळी सागर दोशी यांनी बोलताना सांगितले की “फलटणच्या विकासासाठी आणि युवकांना नवी दिशा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा विचार आणि नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. शहराच्या प्रगतीसाठी आम्ही समर्पित भावनेने काम करू.”
भाजपमध्ये सागर दोशी यांच्या प्रवेशानंतर त्यांच्या मित्र परिवारासह ओंकार गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशामुळे आगामी फलटण नगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
फलटण शहरातील युवकांमध्ये सागर दोशी यांच्या प्रवेशामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.राजकीय पटलावर एक प्रभावी युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे.











