फलटण प्रतिनिधी :
महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्यावतीने २ दिवसीय २७ वे मराठी जैन साहित्य संमेलन श्रीचंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर शेजारी, नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे गुरुवार दि. २५ व शुक्रवार दि. २६ डिसेंबर असे दिवस आयोजित करण्यात येत आहे. फलटण शहराला लाभलेल्या ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक परंपरांच्या पार्श्वभूमीवर येथे होत असलेले मराठी जैन साहित्य संमेलन इथल्या परंपरांमध्ये वाढ करणारे ठरेल असा विश्वास प्रा. डी. ए. पाटील यांनी व्यक्त केला आहे.
फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या या २७ मराठी जैन साहित्य संमेलना विषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. डी. ए. पाटील बोलत होते. यावेळी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विजयदादा आवटी, संजय देवगोंडा पाटील व सुरेश रोटे, स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत शांतीलाल दोशी, नितीन गांधी, प्रकाशभई दोशी (वाकडमाने), दिपकभई दोशी उपस्थित होते.
जैन धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून सर्वार्थाने समृद्ध असणाऱ्या फलटण धर्मनगरीत जैन साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी, बाल साहित्यिक, स्वाध्याय प्रेमी, लेखक - वाचक, महिला - पुरुष, युवक - युवती यांच्या सहयोगाने साहित्यिक, रसिक, वाचक, श्रोत्यांची मांदियाळी संमेलन स्थळी असेल असा विश्वास व्यक्त करीत फलटण येथे हे मराठी चैन साहित्य संमेलन दुसऱ्यांदा होत असल्याचे प्रा. डी. ए. पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
गुरुवार दि. २५ डिसेंबरच्या पहिल्या सत्रामध्ये या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रख्यात कथाकार, विचारवंत व साहित्यिक विजय आवटी सर भूषविणार आहेत. मराठी जैन साहित्य संमेलनाचे उद्घाटन जैन धर्माचे अभ्यासक, इतिहासकार, शिव संभाजी चरित्राचे व्याख्याते व पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत शांतीलाल दोशी फलटण हे सर्वांचे स्वागत करतील. या संमेलनास मंगल सानिध्य प. पू. १०८ आचार्य श्री पद्मनंदी महाराज सत्संग प. पू. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मीसेन महाराज कोल्हापूर, व प. पू. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महाराज नांदणी यांची उपस्थिती लाभणार आहे.
दुसऱ्या सत्रामध्ये जैन साहित्य संस्कृती मध्ये फलटणचे योगदान या विषयावरील परिसंवाद प्रा. डॉ. सुधीर शास्त्री बारामती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत असून डॉ. महावीर शास्त्री व प्रा. डी. ए. पाटील हे परिसंवादात सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात भारतीय चित्रपट सृष्टीत जैनांचे योगदान या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षस्थान डॉ. पुरंदर चौगुले भूषविणार असून डॉ. रावसाहेब पाटील सोलापूर व अनमोल कोठाडिया कोल्हापूर हे या परिसंवादात सहभागी होणार आहेत. चौथ्या सत्रामध्ये जैन पत्रकारिता दशा व दिशा या विषयावरील परिसंवाद डॉ. गजकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रा. ए. ए. मासुर्ले, डॉ. नेमिनाथ शास्त्री या चर्चा सत्रात सहभागी होणार आहेत. पाचव्या सत्रात विजयकुमार बेळंके यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन संपन्न होणार आहे.
दुसऱ्या सभागृहात बालकुमार साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. यामध्ये रंगभरण स्पर्धा, संवाद हरवतो आहे या विषयावर प्रख्यात लेखिका सौ. नीलम माणगावे यांचे मार्गदर्शन व त्याबरोबरच बालकवी संमेलन, बालकथा संमेलन संपन्न होणार आहे.
शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी आजची जैन स्त्री या विषयावरील परिसंवाद प्रा. सौ. वृषाली मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत असून सौ. नेहा शहा, संगीता शहा व सौ. शुक्ला गांधी यांचा सहभाग असणार आहे.
सहाव्या सत्रामध्ये प्राचीन जैन साहित्य एक चर्चा - प्राचीन, अर्वाचीन, प्रागतिक विचार या विषयावरील परिसंवाद जैन इतिहासाचे अभ्यासक संजय देवगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत असून डॉ. महावीर शास्त्री व प्रा. रमेश मडकर हे जैन अभ्यासक चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. त्यानंतर कथाकथन संपन्न होईल.
समारोप सत्रात महास्वामी लक्ष्मीसेन महाराज यांचे सानिध्य लाभेल. त्यामध्ये प्रमुख पाहुणे प्राचार्य चंद्रशेखर मुरुमकर, दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे 'युवक युवती मूल्यवर्धन' व 'उद्योग - व्यवसाय' या विषयावर विचार मांडतील.
या साहित्य संमेलनाच्या संयोजनासाठी स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी, गौरवाध्यक्ष किशोरभई शहा, मंगल दोशी, नितीन गांधी, दीपक दोशी, आलोक दोशी, राजकुमार दोशी, विश्वस्त राजेश शहा, धनंजय शहा, अनिल शहा, विनय गांधी, बीना शहा, डॉ. रविंद्र दोशी, सुकुमार चंकेश्वरा उपस्थित राहणार आहेत.
व्यासपीठ उद्घाटन किशोरभई शहा (चंदूकाका सराफ बारामती) यांच्या हस्ते होईल. जिनवाणी शास्त्र पूजन भूषण द़ोशी, ध्वजारोहण श्रीमती शैला गांधी, भव्य ग्रंथ दिंडी शुभारंभ श्रीमती जयश्री दोशी यांच्या हस्ते होईल. प्राचीन दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन श्रीमती प्रफुल्लता गांधी यांच्या हस्ते होईल. त्यावेळी राजकुमार व्होरा, चंद्रशेखर दोशी, वीरकुमार दोशी हे उपस्थित असतील.
फलटण पंचक्रोशीसह पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील साहित्यिक लेखक कवी यांनी या संमेलनास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी यांनी केले आहे.











