फलटण प्रतिनिधी - पालिका निवडणुकीचा धुराळा कमी झाला मात्र या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे झाल्याची चर्चा फलटण शहरांमध्ये सुरू आहे.
फलटण शहरातील एका माजी नगरसेवकाने सांगितले होते की मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा मला फक्त एकोणीस रुपये खर्च आला होता मात्र, नुकतीच 2025 ची फलटण पालिकेची निवडणूक व त्याचा बारकाईने विचार केला तर अनेक उमेदवारांनी कोट्यवधी रुपयांचा अक्षरशः पाऊस पाडला म्हणण्यापेक्षा चुरडा केला अशी चर्चा फलटण शहरांमध्ये गेली चार दिवस रंगली असून सर्वसामान्य गोरगरिबांनी यापुढे निवडणूक लढवायची का नाही असा यक्ष प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.
या पालिका निवडणुकीमध्ये अनेकांनी लाखो कोट्यावधी रुपये निवडणूक काळात खर्च केले.
सत्ताधारी पक्षांना निवडणूक निधी कमी नसतो मात्र जे नव्याने आपले राजकीय नशीब आजमावत आहेत अशा लोकांनी फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघून समाधान व्यक्त करीत आता आपले यांच्या लाखो रुपयांच्या पुढे तोडके आहोत त्याचबरोबर आर्थिक फाटके आहोत हे समजून यापुढे निवडणूक नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर दुर्दैवाने आली आहे.
फलटण पालिकेमध्ये दोन्ही गटांनी अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला होता या पैशाच्या पावसापुढे सर्वसामान्य उमेदवार कोसळून गेले. यामुळे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व करणारे नगरसेवक फार कमी निवडून आल्याची चर्चा फलटण शहरात सुरु आहे.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या कथित खर्चाबाबत अधिकृत आकडेवारी समोर आलेली नसली, तरी सोशल मीडिया, चहाच्या टपऱ्या आणि राजकीय बैठकींमध्ये हा विषय चांगलाच चर्चेचा बनला आहे.
एकूणच फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पैसा विरुद्ध जनता असा संघर्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, येत्या काळात शहराच्या राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.











