फलटण : धैर्य टाईम्स विशेष

सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय अशी भक्कम परंपरा लाभलेले अश्वाप्रमाणे वेगवान, तत्पर, काळाची पावले ओळखणारे आणि पुरोगामी विचारांची दूरदृष्टी असणारे फलटण नगरीचे अधिपती, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्तानं त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा!
फलटण ही ऐतिहासिक नगरी आहे.या नगरीचे अधिपती श्रीमंत रामराजे प्रतापसिंहराजे नाईक निंबाळकर हे राजघराण्याचे 29 वे वंशज असून फलटणच्या राजघराण्याची दैदिप्यमान परंपरा अखंडितपणे चालवत आहेत.ते स्वतः उच्चविद्याविभूषित असून पुण्यातील गरवारे कॉलेज व फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातून एमएस्सी केली आहे.तसेच त्यांनी कायद्यातील एलएलएम ही पदवी प्राप्त केली आहे.उच्च विद्याविभूषित,सुसंस्कृत राजकारणी ते मुत्सदी नेते म्हणून ही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्यातील करारीपणा विधान परिषदेमध्ये दिसून येते.फलटणच्या राजघराण्याची राजकारणापासून तुटलेली नाळ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी 1991 ला पुनर्स्थापित केली. याच वर्षी ते फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. 1995 ला फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. आज फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये जे हिरवेगार नंदनवन फुलवले आहे त्याची मुहूर्तमेढ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी रोवली आहे. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे स्वतः कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते. 1999 मध्ये महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या मा. खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यासोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला व ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाले. 2004 मध्ये ते कॅबिनेट मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बनले.2013 साली ते राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष बनले. तद्नंतर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला. असे जरी असले तरी ते फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यांच्या विकासासाठी कायमच त्यांची धडपड सुरु असते.

राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे फार मोठे योगदान आहे. नर्मदा बचावच्या श्रीमती मेधा पाटकर, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, भारत पाटणकर, सिंधुताई सपकाळ अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणे. त्यांच्या समस्या जाणून त्यावर मार्ग काढणे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे. हे कायमच महाराजांनी केले आहे. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव मुरुम (ता. फलटण) या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी शासन स्तरावरून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे मान्यता मिळाली आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठोस भूमिका घेऊन मुरूमच्या विकासाला प्राधान्य दिले आगामी काळात येथे मुरूम येथे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा ही संकल्प त्यांनी केला आहे.
पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्याच्या विकासाचे स्वप्न पाहिले. त्यांनी दुष्काळी तालुक्यातील पाणी प्रश्नावर दुष्काळी तालुक्यांतील आमदारांचे संघटन बांधून तत्कालीन शिवसेना भाजपच्या युती सरकारला पाठिंबा दिला. त्यांनी बच्छावत आयोगानुसार कृष्णा तंटा लवादामध्ये महाराष्ट्राला मिळणार्या 599 घनफूट पाणी अडवण्याची महत्त्वपूर्ण योजना तयार करून दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. हीच योजना पुढे कृष्णा खोरे विकासच्या रूपानं पुढे आली. ही योजना महाराष्ट्र शासन व जनतेकडून रोखे घेऊन कृष्णा खोरे विकासाची कामे सुरू झाली. जललक्ष्मी योजनेला सुरुवात करून धोम बलकवडी आणि नीरा देवधर धरणांना जलसंजीवनी दिली. श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांनी कृष्णा खोरे प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्यासाठी जे प्रश्न हाताळले ते सहजासहजी कोणालाही हाताळता आले नसते. धरणांचे निर्माण करताना भूमिपूजनापासून ते बांध पूर्ण होईपर्यंत धरणग्रस्त, विस्थापितांचे योग्य पुनर्वसन हे अग्निदिव्य त्यांनी पेलले आहे. त्याच्याच बळावर आज कायम दुष्काळी भाग ओळखला जाणार्या भागात त्यांना भगीरथ म्हणून संबोधले जाते.
नगराध्यक्ष म्हणून पदावर असताना जकातीचे खासगीकरण व अतिक्रमण पुनर्वसन योजना आखून आज त्या सर्व व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावले. त्यांच्यासाठी व्यापारी संकुलाची उभारणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब, मा.अजितदादा पवार यांच्या सहकार्याने फलटण येथील सुरवडी मध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून कमिन्स इंडिया लिमिटेड ही आंतरराष्ट्रीय कंपनी आणली. यामुळे स्थानिकांना व बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. तालुक्यातील बहुउद्देशीय विविध योजना, नळपाणी पुरवठा योजना, रस्ते, वीज, संपूर्ण ग्रामस्वच्छता या गोष्टींवरही त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. आपले बंधू फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अनेक जबाबदार्या सोपवून त्यांच्याकरवी जिल्हा परिषद सातारा व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध विकास योजना सुरू केल्या. फलटण संस्थांचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी चालवलेला पुरोगामी विचारांचा वसा व वारसा आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर समर्थपणे चालवत आहेत.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना आपण दूरदृष्टी असलेले नेते का म्हणतो याची प्रचिती खालील प्रस्तावित कामासाठी त्यांनी आणलेल्या निधीवरून दिसून येईल.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रवास थक्क करणारा आहे. प्राध्यापक, प्राचार्य, नगराध्यक्ष, आमदार, ते कॅबिनेट मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, विधान परिषद सभापती पदापर्यंत जातो. ही अतिशय दैदिप्यमान कारकीर्द आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गेली 32 वर्षे महाराष्ट्रातील राजकारणावर आपला आदर्शवत, अभ्यासू ते सुसंस्कृत नेता म्हणून ठसा उमटवत आहेत. विरोधकांनाही हेवा वाटावा, असे हे बहुआय्यामी व्यक्तिमत्व आहे. सामान्यत: विरोधकांना कोपरखळ्या देत किंवा त्यांच्यावर टीका करीत अवास्तव बोलणारे अनेक नेते फलटण मध्ये होते आणि काही होऊन गेले पण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी सुसंस्कृतपणे त्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर स्वतः उच्च विद्याविभूषित असल्याने फलटण मध्ये शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक तसेच कृषी, अभियांत्रिकी आणि विधी या महाविद्यालयांची उभारणी त्यांनी केली. श्रीराम साखर कारखान्याची दुरावस्था पाहिल्यानंतर त्यांनी त्याला उर्जित अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला. कारण फलटणच्या अर्थकारणात या कारखान्याचे महत्वपूर्ण योगदान आहे. हा कारखाना श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत शिवजीराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या तत्कालीन सहकार्यांनी उभारलेला हा राज्यातील दुसरा सहकारी साखर कारखाना आहे. आज तो पूर्ण क्षमतेने सुरु आहे. न्यू शुगर वर्क्स साखरवाडी हा कारखाना तत्कालीन व्यवस्थापनामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला होता. श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांनी शेतकर्यांची, कामगारांची थकीत देणी दिली पाहिजे या भावनेने श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विनंती करून हा कारखाना सुरू करण्यास सांगितले.

पर्यावरणवादी व निसर्ग प्रेमी असणार्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी भरपूर वृक्षारोपण करण्याचा संकल्प दिला आहे. अगदी राजकारणी लोकांनीही झाडे लावल्याशिवाय त्यांना निवडणूक लढवायची संधी देऊ नये असे म्हटले आहे. थोडक्यात पृथ्वीचे वाढणारे तापमान व त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी त्यांना भविष्यातील धोका दिसत असून ते जास्तीजास्त झाडे लावण्याचा व ती जागवण्याचा संदेश देत आहेत. ही पृथ्वी वाचवण्यासाठी झाडे लावण्याचा विचार त्यांनी विधान परिषदेतही मांडला.
राजकारणासाठी राजकारण करणार्यातले व्यक्तिमत्व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर नाहीत. त्यांनी कायम विधायक विकासाचे राजकारण केले. तालुक्यातील वादविवाद, भांडण-तंटे मिटवून गावागावात एकोपा निर्माण केला. फलटण ही कायमच विद्रोहाची बीजे पेरून परिवर्तनाची सुपीक पिके उभी करणारी भूमी आहे. हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दाखवून दिले आहे.
कला, क्रीडा, संगीत, साहित्य, उद्योग, सामाजिक, आर्थिक, राजकीय असा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. आज त्यंच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा!
अमित अशोकराव भोईटे, फलटण











