फलटण प्रतिनीधी : फलटणमधील मुक्काम आटपून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा बरडच्या दिशेने सकाळी निघाली असता फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये पालखी सोहळ्यातील वाहने तात्काळ न सोडल्याने आळंदी संस्थान विश्वस्त व पोलिसांमध्ये खडाजंगी झाली. वाहतूक व्यवस्था सुरळीत करत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सकाळी नाना बरडच्या दिशेला मार्गस्थ झाला.
फलटण मधून एक दिवसाच्या मुक्कामानंतर सकाळी माऊलींची पालखी बरडच्या दिशेने रवाना झालो बरड मुक्कामासाठी पालखी सोहळा जात असताना विडणी येथे पहिला विसावा असतो. यावेळी पालखी सोहळ्यातील काही वाहने पुढे जाऊन दिंडीतील वारकऱ्यांना जेवण व नाष्टा तयार करतात. परंतु पालखी सोहळ्यातील वाहतूक बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आलेल्या पोलिसांच्या हलगर्जीमुळे पालखी सोहळ्यातील वाहने नाना पाटील चौक येथून बरडकडे जाणाऱ्या मार्गावर थांबवून ठेवण्यात आली. पालखी सोहळ्यातील गाड्या वाहतुकीत अडकल्यामुळे दिंडीतील काही चालकांनी पालखी सोहळा विश्वस्तांना याबाबत कल्पना दिल्यानंतर विश्वस्त स्वतः वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी नाना पाटील चौक येथे आले.
दरम्यान श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार (आरफळकर) व ईतर रस्त्यावर उतरले असताना सातारा जिल्हा पोलीस उपअधीक्षक आचल दलाल, फलटण शहर प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा हे स्वतः यावेळी समक्ष हजर होते. आळंदी ते पंढरपूर यावेळी सोहळ्या दरम्यान वेळेचे काटेकोर नियोजन केले जाते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण या करीता विशेष वाहने असतात. सदरची वाहने अगोदर व्यवस्थेकरिता पुढे पोहचत असतात. मात्र हिच वाहने पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे फलटण शहरात अडकून पडली त्यामुळे नियोजित वेळापत्रक कोलमडून गेले असल्याने श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त यांनी पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
आळंदी संस्थांच्या झालेल्या पालखी पूर्व मीटिंगमध्ये संस्थांकडून दिलेल्या सूचना यांचे पालन पोलिसांकडून होत नसल्याने आळंदी संस्था कमिटी कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी यांना विश्वस्त यांनी चांगलेच धारेवर धरले. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार (आरफळकर) व ईतर रस्त्यावर उतरले. यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत करत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सकाळी नाना पाटील चौकातून ८: ३६ मिनिटांने बरडच्या दिशेला मार्गस्थ झाला.











